राज्यसभा निवडणूक: महाराष्ट्रात मोठा सस्पेंस संपला, मतदानापूर्वी MVAच्या समर्थनार्थ आले AIMIM

शुक्रवार, 10 जून 2022 (09:32 IST)
Rajya Sabha: 6 जागांसाठी आज मतदान, 'MIMची 2 मतं शिवसेनेला जाणार'
 राज्यसभेची निवडणूक आज (10 जून) ला पार पडणार आहे. 9 वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे.  
 
महाराष्ट्रातून एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार मैदानात आहेत.
 
राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे
 
"आज 7 वाजता चित्र स्पष्ट होईल, महाविकास आघाडीचे 4 उमेदवार निवडून येतील. भाजपचेसुद्धा 2 उमेदवार निवडून येतील. चूरस वगैरे काही नाही. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या निवडणुकीत तुम्हीला हे आकडे स्पष्ट दिसतील," असं शिवसेना उमेदवार संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
प्रफुल्ल पटेलांसाठी राष्ट्रवादीनं कोटा वाढवल्याचा बातम्या विरोधीपक्षांकडून पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजिबात नाराज नाहीत. माझी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे, असं राऊत पुढे म्हणाले आहेत.
 
राजकीय पक्षांची जोरदार फिल्डिंग
राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये आहे. मतदान होईपर्यंत त्यांना तिथून न हलण्याचा आदेश देण्यात आला आहे. 
 
त्यातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं ट्वीट करून जाहीर केलं आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना एमआयएमची 2 मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना दिली जातील असं खासदार एम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.
 
राज्यसभा निवडणुकीत जरी ही बाब शिवसेनेसाठी दिलासा दायक ठरणार असली तरी येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसाठी ही बाबत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान एमआयएमच्या लोकांची आमच्याशी अधिकृत चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे नेते सचिन आहिर यांनी सांगितलं आहे. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली असावी असं आहिर म्हणाले आहेत.
 
एमआयएमनं कुणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीकडे आकडे आहेत. आमचा विजय निश्चित आहे, असं काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती