राजू शेट्टी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा

शनिवार, 10 एप्रिल 2021 (16:18 IST)
‘जर महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही’, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.
 
‘लस’कारणावरुन केंद्र आणि राज्यामध्ये राजकारण सुरु झाले आहे. ही खडाजंगी सुरु असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिले आहे.
 
‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिले आहे. जर एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लसीच्या पुरवठ्यात वाढ झाली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही’, असा इशारा देण्यात आला आहे.
 
सध्या कोरोनाविरोधातील लसीवरून देशात सुरु असलेले राजकारण सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा कळू लागले आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे. लसीकरण केंद्र बंद पडण्याची संख्या आता वाढताना दिसत आहे. एका बाजूने भरमसाठ रुग्णवाढ, दुसर्‍या बाजूने नागरिकांची लसीची होणारी मागणी या दुहेरी संकटात सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणा सापडली आहे. राज्य सरकार रोज लस द्या म्हणून केंद्राकडे मागणी करत आहे आणि केंद्र आम्ही सध्या एवढीच लस देऊ, या अविर्भावात आहे. केंद्राचे लस वाटपाचे धोरण जर पाहिले तर महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती