ममता बॅनर्जींचा भाजपवर घोळ केल्याचा आरोप

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (19:48 IST)
पश्चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नंदीग्राम इथल्या एका मतदान केंद्रावर भाजपनं घोळ केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला आहे.
 
या आरोपांनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: बायल इथल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी निवडणूक लढवत आहेत.
 
ममता बॅनर्जी यांच्यानंतर शुभेंदू अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचले.
 
यावेळी ते म्हणाले, "ममता बॅनर्जी यांना कुणाचाच पाठिंबा नाहीये. त्यांनी निवडणूक हरली आहे."
 
बायल इथल्या या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही उपस्थित आहेत.
 
ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सध्या येथील मतदान थांबवण्यात आलं आहे.
 
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं आहे.
 
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी जयनगर इथं एक प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या या पत्राविषयी म्हटलं, "या निवडणुकीत पराभव होईल या भीतीमुळेच ममता बॅनर्जी इतर पक्षातील नेत्यांकडे मदतीची याचना करत आहे."
 
पश्चिम बंगालमध्ये आज (1 एप्रिलला) 30 विधानसभा जागांवर दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. हा टप्पा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण, नंदीग्रामचा संग्राम ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी असा होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती