मुंबईत नव्या इमारतींमधील 50% सदनिका मराठी माणसांसाठी राखीव ठेवा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (19:50 IST)
मुंबईत नव्या इमारतींमधील 50% सदनिका मराठी माणसांसाठी राखीव ठेवाव्यात, अशी ही मागणी आहे. पार्ले पंचम या संघटनेनं मुख्यमंत्र्यांना  पत्र पाठवून ही मागणी केलीय. नव्या इमारतींमधील 20% घरं लहान आकाराची हवीत, असंही या पत्रात म्हटलंय. मुंबईतल्या काही इमारतींमध्ये मांसाहारी मराठी लोकांना घर नाकारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर काही वेळा बिल्डरांकडूनही मराठी माणसाची अडवणूक केली जाते. त्यामुळे नव्या इमारतीत घरांचं बुकिंग सुरु झाल्यानंतर पुढचं एक वर्ष मराठी माणसासाठी 50 टक्के आरक्षण ठेवावं असा पर्याय ठेवावा अशी मागणीही करण्यात आली आहे. एक वर्षानंतर मराठी माणसांकडून बिल्डरला ती घरं कोणालाही विकण्याची परवानगी असेल असंही पार्ले पंचम या समाजिक संस्थेने म्हटलं आहे.
 
गेल्या काही वर्षात मुंबईत टोलेजंग इमारती बांधल्या जात असून अलिशान घरं बांधली जात आहेत. या घरांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळे अशा इमारतीत 20 टक्के घरं ही लहान आकाराची ठेवण्यात यावीत, या घरांसाठी एक वर्ष केवळ मराठी माणसासाठी आरक्षण असावं, तसंच या घरांचा मेन्टेंनन्सही परवाडणारा असावा असंही मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.
 
काहीवेळा अलिशान घरं घेण्याची आर्थिक ताकद असतानाही मराठी माणसाला ते मांसाहारी असल्याचं कारण सांगत बिल्डर घर विकण्यास तयार होत नाही, ही मराठी माणसाची शोकांतिका आहे, हा प्रकार मोडीत काढला जावा अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती