Mumbai Rain मुंबईत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

बुधवार, 13 जुलै 2022 (12:23 IST)
Mumbai Rain मुंबई आणि महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने (IMD) पालघर, रायगड, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत रात्रभर संथपणे कोसळणाऱ्या पावसाने सकाळपासून जोर पकडला आहे. मुंबई आणि उपनगरातही मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला आणि काही तासांतच शहरातील अनेक भाग जलमय झाले. काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.
 
महाराष्ट्रातील अनेक भागात संततधार पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये तीन मुलांसह किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून पूरग्रस्त भागातून 95 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालात म्हटले आहे की एनडीआरएफच्या 13 पथके आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्या राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
 
हवामान खात्याने नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.
 
मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत नाशिक शहरात 24 तासांत 97.4 मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील सप्तशृंगी मंदिराजवळ सोमवारी जोरदार पाऊस झाला. मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी साचल्याने सहा भाविक किरकोळ जखमी झाले.
 

#WATCH | Mumbai: Amid incessant heavy rainfall lashing the city, Andheri subway continues to remain submerged under the rainwaters pic.twitter.com/gvNeeLnboF

— ANI (@ANI) July 13, 2022
पालघर जिल्ह्यात मंगळवारी मागील 24 तासांत 109.9 मिमी पाऊस झाला. पालघर जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी मागील 24 तासांत 106.3 मिमी पाऊस झाला.
 
मुंबईच्या उपनगरात इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात एकाचा बुडून मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या पुरात पुलावरून एसयूव्ही वाहन वाहून गेल्याने मध्य प्रदेशातील तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता आहेत. अपघातात ठार झालेले लोक मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी होते.
 
ठाण्यातील राबोडी येथील रहमत नगर भागात घराचा काही भाग कोसळला. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात मंगळवारी चार ते आठ वर्षे वयोगटातील तीन भावंडांचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे जीर्ण निवासी इमारतीचा काही भाग कोसळून चार जण जखमी झाले आहेत.
 
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर जलसंपदा विभागाने नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 284.16 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील 70 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 25 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
 
मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील सोयखुर्द येथे मंगळवारी दुपारी वीज पडून सरकारी शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.
 
मंगळवारीही गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये आणखी सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. 1 जूनपासून राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 69 जणांना जीव गमवावा लागला आहे. पूरग्रस्त भागातून एकूण 27,896 लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी 18,225 अजूनही निवारागृहांमध्ये आहेत आणि उर्वरित त्यांच्या घरी परतले आहेत.
 
दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सौराष्ट्रातील कच्छ आणि राजकोटच्या काही भागात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून कच्छमधील अंजार तालुक्यात 167 मिमी पाऊस झाला, तर जिल्ह्यातील गांधीधाम तालुक्यात 145 मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण गुजरातमधील नर्मदा, सुरत, डांग, वलसाड आणि तापी जिल्हे आणि राज्याच्या मध्य भागात पंचमहाल आणि छोटा उदयपूरमध्येही जोरदार पाऊस झाला.
 
भारतीय हवामान खात्याने (IMD) बुधवारी वलसाड, नवसारी, सूरत, तापी, डांग, नर्मदा, छोटा उदयपूर जिल्ह्यांसह सौराष्ट्र विभागातील कच्छ, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका आणि मोरबी येथे अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. रेड अलर्ट जारी केले आहे.
 
नवसारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्णा आणि अंबिका नद्यांना पूर आला असून, काही सखल भागात पूर आला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने संयुक्त कारवाईत नर्मदा जिल्ह्यातील राजपिपलाजवळ कर्जन नदीच्या काठावर अचानक पाणी वाढल्याने अडकलेल्या 21 जणांची सुटका केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती