घटनाक्रम लक्षात ठेवणे, त्याची आठवण येणे, तसेच जसेच्या तसे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहणे हे केवळ मानवी मेंदूच्या द्वारेच शक्य असल्यामुळेच मानवी मेंदू भूतकाळातच नव्हे तर भविष्य काळातही मनाच्या माध्यमातून संचार करू शकतो असे मत संशोधनाअंती मांडण्यात आले आहे. त्याचवेळी यासाठीच्या चाचण्या इतर अनेक प्राण्यांच्यावर करण्यात आल्या. त्या अयशस्वी ठरल्या. मानवाच्या व्यतिरिक्त काही प्राण्यांमध्ये एखादी घटना स्मृतीमध्ये ठेवण्याचे वर्तन आढळले. मात्र ते टाइम ट्रॅव्हलसारखी गोष्ट अनुभवण्यास पुरेसे नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एखादी गोष्ट रचून ती प्रतिबिंबित करण्याची क्षमता फक्त मानवामध्येच आहे. जर्मनीतील रुर विद्यापीठामध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले. न्यूरोसायन्स अँड बिहेविरल सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन छापण्यात आले आहे.