बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी विशेष : पराक्रमी लढवय्ये सरदार बाजीप्रभू देशपांडे

गुरूवार, 14 जुलै 2022 (07:02 IST)
Baji Prabhu Deshpande :छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे जे व्रत हाती घेतले होते त्यात असंख्य मावळ्यांनी मदत केली. आणि वेळी प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती पण दिली. असेच एक सरदार बाजीप्रभू देशपांडे होते.त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यास यश मिळवून दिले. बाजीराव प्रभू देशपांडे यांचे मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांचा जन्म चंद्रसेनिया कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता आणि ते एक मराठा योद्धा होते.
 
बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील पराक्रम आजही अंगावर शहारे आणतो. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड मधील झुंजीला जगाच्या इतिहासात आदराचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली
 
त्यांच्या पराक्रमामुळे प्रभावित होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात एक महत्त्वाचे स्थान दिले. मोगल सैन्याशी लढा देताना त्यांनी आपले शौर्य दाखवत मोगल सैन्याच्या शंभराहून अधिक भयावह सैनिकांसह एकट्याने लढा दिला आणि सर्वांना ठार मारले आणि जिंकले.बाजीप्रभू देशपांडेनी देखील स्वराज्यासाठी आपली स्वामी निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पित केली.हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.
 
बाजीप्रभूं देशपांडे हिरडस हे मावळाचे देशपांडे होते. बाजींचे शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यदलात उच्च पदावर बसवले.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहून पुरंदर, कोंडाना आणि राजापूर किल्ले जिंकण्यास मदत केली. बाजी प्रभूंनी रोहिडा किल्ला काबीज केला आणि आजूबाजूचे किल्ले काबीज केले यामुळे वीर बाजी मावळ्यांचे एक प्रमुख सरदार  म्हणून गणले जाऊ लागले आणि लोक त्यांचा आदर करू लागले.
 
बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल,फुलाजी प्रभू आणि सुमारे 600 बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते
 
अफजलखान मोठा बलशाली सरदार होता. पण महाराजांनी त्याचे व आदिलशाही फौजेचे पारिपत्य केले. प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशाही फौजे चा धुव्वा उडवून आदिलशहाला महाराजांनी मोठे खिंडार पाडले. अफझलखानाच्या मृत्यूनंतर बाजींनीही पार कुशल नावाच्या जंगलात आदिलशाही छावणी नष्ट केली आणि शिवाजी महाराजांना स्वराज्याचा विस्तार करण्यास मदत केली.अफजल खानाच्या मृत्यूनंतर केवळ 13दिवसांनी महाराजांनी कऱ्हाड, सुपे असा मुलुख काबीज करत कोल्हापूर पर्यंत पोहोचले. तेथून जवळच होता शिलाहार राजांचा प्रसिद्ध किल्ला पन्हाळाही आपल्या स्वराज्यात सामील केला.
 
आदिलशाही सरदार होता कर्णुळचा सिद्दी जौहर. त्याला सलाबतखान असा 'किताब देऊन त्याच्या बरोबर भली मोठी फौज देण्यात आली. त्याने दिल्लीचे बादशहा कडून स्वराज्याविरुद्ध लढा देण्यासाठी मदत मागितली. त्यामुळे स्वराज्यावर चारही बाजूने संकट आली.  
 
सिद्धी जौहरच्या भल्या मोठ्या फौजशी युद्ध करणे शक्य नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर परत आले. त्यांच्या मागे सिद्धी जौहर आला. आणि त्याने पन्हाळा किल्ल्यावर चारही बाजूने वेढा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यातून बाहेर पडून जाणे फार कठीण झाले. काही करून सिद्धीचा हा वेढा ढिला पडलाच पाहिजे. यासाठी महाराजांनी एक गनिमी कावा केला. यावेळी बाजीप्रभूंनी त्यांची मदत केली. यामध्ये त्र्यंबक भास्कर, गंगाराम पंत असे मुत्सद्दी होतेच. शिवाय बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे हे हिरडस मावळातील पराक्रमी आणि निष्ठावान सरदार होते. यावेळी बाजीप्रभूंनी मोठ्या हिंमतीने आणि वडिलकीच्या भावनेने महाराजांना 300 मावळे घेऊन विशालगडाकडे जाण्यास सांगितले. राहिलेले 300 मावळ्यांसह  घोडखिंडीत शत्रूला रोखण्यास थांबले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर पोहोचल्यावर तोफेचे आवाज द्यायचे. तोपर्यंत बाजींनी सिद्दीच्या सैन्याला खिंडीत रोखून धरायचे असे ठरले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांना अर्धे सैन्य देऊन, बाजी स्वत: घोड्याच्या दरीच्या दाराजवळ अडकले. बाजीप्रभू आणि मावळे घोड खिंडीत सज्ज झाले. आदिलशाही सैन्य समीप आले. शत्रुची पहिली तुकडी समोर आली. आणि भयंकर आवेशाने बाजी प्रभू आणि मावळे शत्रवर तुटून पडले. दोन्ही हातात दांड पट्टे चढवून बाजीप्रभू शत्रूंची मुंडकी उडवीत होते. एकच ध्यास होता विशाळगडावर महाराज पोहोचून तोफेचे आवाज येत नाही तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू द्यायची नाही. बाजीप्रभू, फुलाजी आणि इतर मावळे बेफाम होऊन लढू लागले.
 
शत्रूंच्या तुकड्यावर तुकड्या येत होत्या. पण मावळे जे होते तेवढेच लढत होते.जोरदार युद्ध सुरू झाले. बाजी प्रभूंनी मोठे पराक्रम दाखवले. या युद्धात त्यांचे मोठे भाऊ फुलाजी मारले गेले. बरेच सैनिकही मारले गेले. जखमी होऊनही बाजींनी आपल्या सैन्याला प्रोत्साहन दिले. घोडखिंड रक्ताने माखली. बाजीप्रभू अजूनही त्याच त्वेषाने लढत होते.छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मावळ्यांसह विशालगडावर पोहोचले. जवळपास 21 – 22 तासांनी छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर येथे पोहोचले, तेव्हा त्यांनी तोफेच्या आवाजाने बाजी प्रभूंना ते सुरक्षित असल्याचे कळविले. बाजीप्रभूंनी ते ऐकले. धन्य झाले पण तेवढ्यात घात झाला. शत्रूचा घाव वर्मी बसला. बाजीप्रभू खाली कोसळले. बाजीप्रभू, फुलाजी आणि असंख्य मावळ्यांच्या रक्ताने गजापुरची घोडखिंड पावन झाली.
 
आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठीची कर्तव्य पार पाडत, 14 जुलै 1660 रोजी या महान वीरांनी मृत्यूच्या मांडीवर कायमचा आश्रय घेतला.
 
बाजी प्रभूंमुळेच छत्रपती शिवाजी महाराज जिंकले आणि म्हणूनच हिंदवी स्वराज स्थापन होऊ शकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत अनेक सरदार, सैनिक आणि मंत्री होते. त्याच्या दरबारात एकापेक्षा जास्त सरदार होते जे खूप शूर होते. त्या शूर सैनिकांपैकी एक बाजी प्रभू देशपांडे देखील होते. ते सर्व सरदारांपेक्षा  वेगळे होते.
 
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी प्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजीवर विशालगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशालगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. बाजीप्रभु देशपांडे आपल्या पराक्रमाने आणि स्वमिनिष्ठेने अजरामर झाले .हिंदवी स्वराज्य स्थापनेतील त्यांचे बलिदान कायम स्मरणात राहील.
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा सैन्याने पन्हाळगड ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्धी जोहर ने किल्ल्याभोवती सापळा रचला.त्यात मराठा सैन्यासह छत्रपती शिवाजी महाराज अडकले. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि मराठा सैन्याने आदिलशाही सल्तनतचा कसा पराभव केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण दिले.मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेले पावनखिंड हे इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा चित्रपट बनविण्यात आला असून या चित्रपटात पावनखिंडाची लढाई दाखविली आहे. 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती