इराकमधील गृहयुद्धाची झळ भारतीय जनतेला बसली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलसह डिझेल महागले. महागाईने आधीच त्रस्त असलेली जनता आता पेट्रोलचे दर वाढल्याने चांगलीच होरपळली आहे. रेल्वे भाडेवाढ, भाजीपाला महागला आहे. त्यात मोदी सरकारने चांगले दिवसांचे स्वप्न दाखवले होते. परंतु आता ही वाढ करून संपूर्ण देशवासियांच्या अपेक्षाभंग केल्याचा प्रतिक्रिया समाजातून उमटू लागल्या आहेत.
पेट्रोलच्या दरामध्ये प्रतिलिटर 1 रुपया 69 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये प्रतिलिटर 50 पैसे दर वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसल्यामुळे इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. कॉंग्रेसच्या काळात महागाई नियंत्रणात होती. मात्र मोदी सरकारला सत्तेत येऊन 34 दिवसांत 34 पैशानेही महागाई कमी झाली नाही. उलट महागाई वाढत असल्याची टीका कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.