१. उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ नकोशी वाटते. परंतु एकदम थंडगार पाणीदेखील अंगावर नको वाटतं. अशावेळी 'काटा मोड' पाणी तयार करायला अनेकजण अगदी थोडं गरम पाणी तापवतात किवा मग पाईपमधील पाणी गरम होण्याची वाट पाहात उशिरा आंघोळ करतात. मग भाजकं पाणी मिळतं. त्यात परत थंड पाणी टाकतात. पाण्याचं आधीच दुर्भिक्ष, त्यात अशी ऊर्जेची आणि पाण्याची नासाडी! त्यापेक्षा अगदी सोपा उपाय आहे. घरी सोलर वॉटर हिटर नाही ना? मग अगदी सरळ पाण्याची गच्च भरलेली बादली सकाळी सकाळी उन्हात ठेवायची. अगदी नैसर्गिक 'ऊन-ऊन' पाणी तयार होतं! पाण्याची पण बचत होते ऊर्जेची देखील!