दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर कोल्हापूर

रविवार, 13 एप्रिल 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्र म्हणजे समृद्ध प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले सुंदर राज्य आहे. या समृद्ध राज्यात अनेक प्राचीन भव्य दिव्य धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे आहे. त्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे दख्खनचा राजा जोतिबा होय. दख्खनचा राजा जोतिबा हा अनेक भक्तांचे कुलदैवत आहे. तसेच नवसाला पावणार ज्योतिबा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. दख्खनचा राजा जोतिबाची आज पासून म्हणजेच चैत्र पौर्णिमेपासून यात्रा सुरु होते. तुम्ही देखील या यात्रेला नक्कीच भेट देऊ शकतात.  
ALSO READ: 'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर
ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून १७ किमी पन्हाळा डोगंराच्या रांगेत आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून साधारण ३१२४ फूट उंचीवर आहे. जगभरातून मोठ्या संख्येने यात्रेकरू ज्योतिबा मंदिराला भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात असलेले ज्योतिबा मंदिर हे भगवान शिवाचे अवतार असलेल्या भगवान ज्योतिबाला समर्पित तीर्थक्षेत्र आहे. तसेच हिरवळ आणि नयनरम्य डोंगरात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे.

तसेच ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही ओळखतात. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहे. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहे.
ALSO READ: काळाराम मंदिर नाशिक
दख्खनचा राजा जोतिबाची आख्यायिका-
ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.  तसेच देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायर्‍या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे.  
ALSO READ: संत एकनाथांची समाधी श्री क्षेत्र पैठण
तसेच या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहे.  कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहे.

ज्योतिबाची मूर्ती
असे सांगण्यात येते की, श्री ज्योतिबाची मूर्ती ही स्वतः बनवलेली आहे. ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. तसेच दैनंदिन जीवनात ज्योतिबाची पूजा वेगवेगळ्या अलंकारांनी केली जाते. अनेक भक्त मंदिरात येऊन नवस करतात. व नवसाला पावणारा ज्योतिबा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नवस फेडायला आलेले भक्त ज्योतिबाच्या नावान 'चांगभलं' म्हणून जयघोष करतात. व गुलाल उधळतात.

जोतिबाचे मंदिर कोल्हापूर जावे कसे?
दख्खनचा राजा जोतिबाला जाण्यासाठी अनेक वाहन उपलब्ध आहे. कोल्हापूर आहे महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. तसेच कोल्हापूर अनेक प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर स्थानिक वाहनांच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. कोल्हापूर शहर अनेक रेल्वे मार्गांशी देखील जोडले गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती