औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तिहेरी लढत हर्षवर्धन जाधव लढवण्याची घोषणा

सोमवार, 1 एप्रिल 2024 (09:09 IST)
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तिहेरी लढत पाहायला मिळू शकते. याचे कारण म्हणजे, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव  यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना जाधव म्हणाले की, वंचितने संधी दिली तर त्यांच्याकडे निवडणूक लढेन अथवा अपक्ष निवडणूक लढेन, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.
 
कार्यक्रमात बोलताना जाधव म्हणाले, ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा, ज्यांनी कामे केली त्यांना निवडून आणा, ज्यांनी कामे केली नाहीत, त्यांना पाडा. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. देशोधडीला लागलोय. इतर समाजाचे आणि शेतकऱ्यांची कामे करतोय. वीज बील, पिक विमा, पीक कर्ज, पिण्याच्या पाण्याचे कर्ज यासाठी सातत्याने आंदोलने करत आहे. मला वाटते की लढले पाहिजे, म्हणूनच मी अपक्ष लढणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.
 
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी ट्रॅक्टर चिन्हावर 2019ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 2 लाख 83 हजार 798 मते मिळली होती. यामुळेच चंद्रकांत खैरेंचा पराभव होऊन इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी एमआयएमकडून पुन्हा एकदा खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती