ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला अधिक महत्त्व आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. स्कंद पुराण, भविष्य पुराण आणि महाभारत सारख्या ग्रंथामध्ये या व्रताचे महत्त्व सांगितले आहे. हे व्रत विवाहित स्त्रिया किंवा वयात आलेल्या मुली करतात. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी आणि नात्यासाठी केले जाते.
वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार महत्व असते. या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या पतीच्या दीघार्युष्यासाठी उपवास करतात. मात्र उचित फळप्राप्तीसाठी या व्रताचे काही नियम आहेत. या दिवशी महिलांनी काय करावे आणि काय करु नये हे जाणून घ्या. तसेच पहिल्यांदा उपवास करत असाल तर तुम्ही या नियमांचे पालन करायला हवे.
वट पौर्णिमा व्रताचे नियम:
सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. संकल्प घेताना पतीच्या दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करावी.
या व्रतात वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वडाच्या झाडाला पाणी, दूध, हळद, कुंकू, अक्षता (तांदूळ), फुले, गंध आणि धूप अर्पण करावे.
व्रतादरम्यान सावित्री-सत्यवान यांची कथा ऐकावी किंवा वाचावी, कारण सावित्रीने आपल्या पतीसाठी यमराजाशी लढा देऊन त्याला परत मिळवले होते.
मांसाहार, मासे, अंडी, कांदा, लसूण, मसालेदार पदार्थ आणि बाहेरचे अन्न टाळावे.
तळलेले पदार्थ, जंक फूड, आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ खाऊ नयेत.
उपवासात निषिद्ध पदार्थ जसे गहू, तांदूळ, कडधान्य (उपवासात परवानगी असलेले पदार्थ वगळता) खाऊ नये.
जर तुम्ही गरोदर असाल, आजारी असाल किंवा आरोग्याच्या कारणांमुळे उपवास करू शकत नसाल, तर फलाहार किंवा सात्त्विक अन्न घेऊन व्रत पूर्ण करू शकता.
अस्वीकारण: हा लेख धार्मिक श्रद्धवेवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा कोणतेही उपाय अमलात आणण्यासाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.