अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी समर्थांनी केली अवतारकार्याची समाप्ती

शनिवार, 8 मे 2021 (14:22 IST)
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार मानले गेले आहेत. हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेले. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्वामींनी खूप काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार असल्याचे मानले गेले आहेत. 
 
गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
 
इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.
 
सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.
 
असे प्रकट झाले महाराज
इ.स. १४५९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत.
 
आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.
 
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
 
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
 
स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी धारणा आहे.
 
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती