‘संपूर्ण सहकार्य केल्यास लॉकडाउन पुन्हा वाढवावा लागणार नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवार

रविवार, 12 एप्रिल 2020 (18:06 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ईस्टर संडे'निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. मानवतेच्या सेवेसाठी प्रेरित करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे 'इस्टर संडे'ची प्रार्थना आपापल्या घरात करावी, कुणीही घराबाहेर पडू नये, घरात राहा, सुरक्षित राहा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'इस्टर संडे' निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, 'इस्टर संडे' म्हणजेच 'पुनरुत्थान दिन'. भगवान येशू ख्रिस्त हे 'इस्टर संडे' दिवशी मृत्यूवर मात करुन पुनरुत्थित झाले होते. यानिमित्ताने त्यांचं स्मरण करत असताना, आपणही 'कोरोना'वर मात करण्याचा निर्धार करुया. भगवान येशू ख्रिस्तांच्या दया, प्रेम, क्षमा, शांती आणि मानवतेच्या सेवेची शिकवण अंगिकारण्याचा प्रयत्न करुया. असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.
 
30 एप्रिलपर्यंत सर्वांनी सहकार्य केल्यास, पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही…
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातली टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे सांगून नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे.
 
आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने टाळेबंदी वाढवली आहे.  लोकहितासाठी घेतलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या टाळेबंदीला राज्यातील जनतेनं सहकार्य करावं. 
 
प्रत्येकानं घरातंच थांबावं, डॉक्टर, पोलिस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं. ही टाळेबंदी यशस्वी झाली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही, याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानंच कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती