युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (09:02 IST)
" वीर धुरंधर प्रौढ प्रतापी पुरंदर श्री श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले "
 
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, सर्वसमावेश, आदर्श शासनकर्ता, सहिष्णू राजा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतरत्रही ओळखले आणि वंदिले जातात. यांचा जन्म 19 फेब्रुवारी फाल्गुन कृष्ण तृतीया 1630 रोजी पुण्यापासून 40 मैलाच्या अंतरावर शिवनेरी किल्ले येथे शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई भोसले यांच्याकडे झाला.
 
यांचे वडील शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाकडे एक सरदार म्हणून होते. नंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहकडे सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशाहने त्यांना पुण्याची जहागिरी दिल्यावर त्यांनी तुकाबाईंशी दुसरा विवाह केला. सहजी आणि तुकाबाईंचे पुत्र एकोजी (व्यंकोजी) भोसले यांनी पुढे जाऊन मग आपले स्वतंत्र राज्य स्थापित केले. जिजाबाई शिवाजींना घेऊन पुण्यात राहायला आल्या. त्या काळी पुण्याची अवस्था फार खराब होती. लहानग्या शिवबा (टोपण नाव) आणि कारभारी दादोजी कोंडदेवांसह पुण्याची पुनः स्थापना केली. 
 
जिजाबाई फार धीर आणि खंबीर होत्या. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांनी शिवबाला मार्गदर्शन दिले. त्या शिवाजींच्या प्रथम आद्यगुरु होत्या. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकारायला त्यांनी शिवाजींना स्फूर्ती दिली. लहान असतानाच काय तर शिवबा मोठे झाल्यावरही त्या त्यांचे मार्गदर्शक असे.
 
शिवाजींचे मार्गदर्शक
युद्धाचा अभ्यास, रणनीती, राज्य कारभाराचे धडे त्यांनी त्यांच्या वडील शहाजीराजेंकडून, सत्तेविरुद्ध लढा करण्यासाठी आवश्यक शिस्तीचे शिक्षण त्यांचा मातोश्री जिजाबाईंकडून, युद्धकला व राजनीती-शास्त्राचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांच्याकडून, आध्यात्मिक मार्गदर्शन संत तुकाराम महाराज तर कर्मयोगाचे धडे समर्थ श्री रामदास स्वामिनींकडून शिकले. समर्थ रामदास आणि शिवाजींचे गुरु-शिष्याचे नाते वेगळेच होते. या सर्वांचे मार्गदर्शन शिवाजींना लाभले.
 
लढाऊ आयुष्य
शिवाजींचे अर्धे आयुष्य लढण्यातच गेले. कधी -कधी ते वेळप्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोप देखील घ्यायचे. 
 
सुरुवातीच लढा
तोरण गडावरील विजय  
इ.स.1647 मध्ये निव्वळ 17 वर्षाचे असताना शिवाजींनी तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोविली. त्याच वर्षी त्यांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर किल्ले आदिलशाह कडून जिंकून पुणे प्रांतावर ताबा घेतला. तोरण गडाच्या समोरच्या मुरुंब देवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव राजगड असे ठेवण्यात आले.   
 
शहाजी राजेंना अटक
शिवाजी महाराज यशस्वी होताना बघून आदिलशाहने शहाजी राजेंना बंदी बनवले आणि 5000 सैन्यासह फत्तेखान नावाच्या सरदार पुरंदर किल्ल्यावर शिवाजींना अटक करण्यास पाठविले. तिथे फत्तेखानाचा पराभव झाला. त्याला पकडण्यासाठी बाजीराव पासलकर फत्तेखानाचा पाठलाग करत सासवड पर्यंत गेले. तिथे लढताना बाजीराव मरण पावले. शिवाजींनी मुघल बादशहा शहाजहांनां पत्र पाठवून शहाजी राजेंना सोडण्याबाबतची इच्छा प्रकट केली. शहाजहांनी आदिलशाहवर दबाव आणून शहाजी राजेंची तूर्तात सुटका करण्यास सांगितले. त्याचा मोबदल्यात त्यांना कोंढाणा किल्ला आणि शहाजी राजेंना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
 
जावळी प्रकरण
जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शिवाजीराजे आणि शहाजी राजेंच्या विरुद्ध आदिलशहाकडे कुरापत करत असे. जावळीचा सरदार आदिलशहाशी इमान राखणारा होता. इ.स.1656 साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर करून त्याला धडा शिकविला. नंतर कोंकणाच्या भागात स्वराज्याचा विस्तार झाला. इ.स.1659 साल पर्यंत शिवाजीने पश्चिम घाटातील आणि कोंकणातील चाळीस किल्ल्यांवर विजय मिळवला होता.   
 
अफझल खान प्रकरण
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकल्यानंतर त्यांच्यावर चिडून शिवाजी राजेंना संपविण्याचे काम अफझल खान याने स्वतःच्या हाती घेतले आणि अफझल खान मोठ्या सैन्य आणि लवाजम्यासह अफझल खान मोहिमेवर निघाला. वाईजवळ आल्यावर प्रतापगडावरून महाराजांनी त्याला तोंड देण्याचे ठरविले. तहाची बोलणी सुरू झाली. अंतिम बोलणी करण्यासाठी महाराजाने स्वतः यावे असा आग्रह अफझल खानने केला. शिवाजींच्या वकिलाने (पंताजी गोपीनाथ बोकील) यांनी अफझल खानाला प्रतापगडावरच भेटण्यासाठी आमंत्रित केले. भेटावयास दोन्ही पक्षांची मोजकीच निःशस्त्र माणसे येतील असे ठरले.   
 
शिवाजीराजे जाणून होते की अफझलखान काही दगाबाजी करेल. त्यासाठी त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत धारण केले आणि संरक्षणासाठी वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतात दडविला होता. तसेच वाघनखे हाताच्या पंज्यात वळविलेली होती. शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचा विश्वासू सरदार जीवा महाला तसेच अफझल खान सोबत सय्यद बंडा प्रख्यात असा दांड पट्टेबाज होता. भेटीचे स्थान प्रतापगडावरील एक छावणी ठरले. भेटीच्या वेळेस उंच्यापुऱ्या, बलदंड अफझल खानाने शिवाजी राजेंना जोरात मिठी मारली त्यामुळे त्यांचे प्राण कंठाशी आले. अफझलने कट्यारीने वार करण्याचा प्रयत्न केला पण चिलखत घातल्याने महाराज बचावले. प्रत्युत्तरात महाराजांनी वाघनखे अफझलच्या पोटात घुसवली. 
 
अफझलच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली. सय्यद बंड्याने संतापून तत्क्षणी महाराजांवर दांडपट्ट्याचा वार केला तो वार जीवा महालाने स्वतःवर झेलला आणि राजेंचे प्राण वाचविले. या नंतरच "होता जीवा म्हणून वाचला शिवा" अशी म्हण प्रचलित झाली. अफझलच्या छावणीच्या जवळपासच्या झाडा झुडपांच्यामध्ये दडलेले मावळ्यांनी अफझलच्या सैन्यावर हल्ला करून दाणादाण उडविली. अफझलच्या मुलगा फाजलखान खजिना, हत्ती सर्व टाकून विजापुरास जनान्यासह पळाले.
 
अफझल खानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकण पट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजेंनी पन्हाळा जिंकला. 
 
सिद्धी जौहरचे आक्रमण
अफझल खानाच्या मृत्यूनंतर चिडलेल्या आदिलशहाने त्याच्या सेनापती सिद्धी जौहरास हल्ला करण्यास सांगितले.आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळ गडावर गेले. सिद्धीला त्याचा सुगावा लागताच तो ही पाठलाग करत गेला आणि सैन्यासह तिथेच गडाला वेढा घालून बसला. शिवाजीने जवळच्या विशाल गडासाठी कूच करण्याचे ठरविले. रात्रीच्या वेळी शिवाजीराजे काही मंडळींसह गुप्त मार्गाने शिताफीने निसटले. याचाही सुगावा सिद्धीस लागल्यावर सिद्धी जौहराने सिद्धी मसूदबरोबर काही सैन्य पाठलाग करत रवाना केले. इ.स.1660 साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक मानले जाते.  
 
घोडखिंडीतली लढाई
पन्हाळ गडापासून काही अंतरावर वाटेत सिध्दीने राजेंना घोडखिंडीत गाठले आणि लढाई सुरू झाली. राजेंचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना विशाल गडासाठी जाण्याची विनवणी करून स्वतः लढाई करण्याचे सांगून सिद्धी सोबत लढाई केली आणि विशाल गडावर पोहचल्यावर तोफ्याच्या तीन गर्जना आल्यापर्यंत सिद्धीला खिंडीतच झुंजवत ठेवतील. शिवाजींना हे पटत नसले तरी बाजींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी विशाल गडासाठी कूच केली. बाजीप्रभूने ठरविल्याप्रमाणे सिद्धीस रोखण्याचे प्रयत्न केले पण त्यांचे सैन्य संख्येने कितीतरी पट अधिक असल्याने ते रोखू शकले नाही. त्यात ते घायाळ झाले. त्यांनी आपले प्राण फक्त तोफ्याच्या तीन गर्जना ऐकण्यासाठी कानाशी साठवून ठेवले होते. काही काळानंतर तोफ्याची गर्जना ऐकू आल्यावरच लगेच त्यांनी आपले प्राण सोडले. राजेंना ही बातमी चटका लावून गेली की आपल्यासाठी बाजींनी बलिदान दिले. त्यांनी त्या घोडखिंडीचे नाव पावनखिंड केले. बाजीरावांच्या बलिदानाने पावन झालेली अशी पावन खिंड.       
 
शाहिस्ते खान प्रकरण
मुघल साम्राज्याचा विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्य विस्तारासाठी वेसण घालण्यासाठी औरंगजेबाने आपल्या मामा शाहिस्ता खानाला दक्खनच्या मोहिमेवर पाठविले मार्गात येणारे प्रत्येक राज्य प्रत्येक गावात दहशत पसरवीत विध्वंस करत गेला. चाकण किल्ला जिंकून पुण्यातील लाल किल्ल्यात त्याने मुक्काम ठोकला. शिवाजी राजेंनी शाहिस्ताखानाला संपविण्यासाठी लाल महालात शिरले. शिवाजी आलेले हे समजल्यावर त्याने खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. राजेंनी वार केल्यावर तो वाचला पण त्याचा हातातील तीन बोटं कापली गेली.
 
सुरतची पहिली लूट
इ.स. 1664 संततीच्या युद्धामुळे शिवाजींचा खजिना संपत असण्याचा चिंतेमुळे राजेंनी शेवटी सुरत शहर जे मुघलांच्या राज्यात होते ते लुटण्याचा उपाय शोधून काढला. मुघलांना ही काळजी नव्हती कारण ते लूटपाट करून बळजबरीने स्वतःचा खजिना भरतं होते. सुरत शहरच्या लुटून त्यांनी दोन गोष्टी साध्य केल्या. एक तर मुघलांना धडा दिला आणि दुसरे खजिन्यात भर पडली. शिवाजींनी ही लूट अतिशय मर्यादेत राहून मुलं-बाळ, स्त्रियांचा केसाला धक्का न लावता केली.   
 
मिर्झाराजे जयसिंह प्रकरण
इ.स. 1665 औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले.
 
आग्र्याहून सुटका
इ.स.1666 साली औरंगजेबाने शिवाजींना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापुरावर त्यांनी केलेल्या हल्लेच्या चर्चेसाठी बोलविले होते. तेथे त्यांचा अपमान करून नजरबंद करून आग्रा जयसिंहाचे पुत्र रामसिंहांकडे त्यांची रवानगी केली. तिथून सुटण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. त्यांनी तिथे आजारी असण्याचे सांगितले आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र संभाजीपण असे. त्यांचा प्रकृती सुधारण्यासाठी मंदिरातून मिठाईचे पेटारे येऊ लागले. एके दिवशी ते तिघे त्यात बसून निघून गेले. आग्रा येथून निघून वेषांतर करून ते महाराष्ट्रात पोहोचले. 
 
शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात दैवत मानतात. शत्रू विरुद्ध लढ्या करता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगराची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
 
दिल्ली भेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्ट प्रधान मंडळ स्थापले होते त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्ट प्रधान मंडळाचे फार मोठे यश आहे.
 
शिवराज्याभिषेक
शिवरायांनी तक्तारूढ व्हावे म्हणून सुवर्णाचे तक्त, बत्तीस मणांचे, राजकोषात जेवढी अमूल्य रत्ने होती त्यामधून मोठी मौल्यवान रत्ने तक्तास जडावीत केले. रायरीचे नाव बदलून ''रायगड'' ठेविले आणि सिहांसनास ते गड नेमले. सप्त महानद्यांची उदक, समुद्राची उदक, तीर्थक्षेत्रातील तीर्थोदक आणले. आठ सुवर्ण कलश, आठ तांब्यांनी अभिषेक अष्टप्रधानांनी करावे त्यासाठी सुदिन मुहूर्त "शालिवाहन शके 1596, ज्येष्ठमासी शुद्ध 13 स मुहूर्त काढला. साढेचार हजार राजांना निमंत्रणे पाठवले गेले. रायगडावर साढेचार हजार राजे अभिषेकासाठी जमले होते. 
 
गागाभट्टांनी पवित्र सप्त नद्यांचे जल आणले. 
राजे ब्राह्म मुहूर्तावर उठले, स्नान करून शिवाईमातेला अभिषेक केला आणि माता जिजाऊंचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. कवड्यांची माळ घातली, जिरेटोप डोक्यावर ठेवून भवानीमातेची तलवार कंबरेस जोडून गड फिरावयास गेले. राजे दरबारात येताच त्याक्षणी साढेचार हजार राजांनी मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले. ज्या ठिकाणी बत्तीस मण्यांचे सुवर्ण, मौल्यवान रत्नजडित सिंहासन ठेवले होते त्याला तीन पायऱ्या होत्या. 
 
पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच राजेंचे हृदय हेलावले. त्यांचे डोळे पाणावले त्यांना आठवले "राजे लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा मारता कामा न ये, शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील पण राजगडाचा शिवाजी राजा पुन्हा जन्मास येणार नाही राजे" आणि त्यांचा डोळ्यातून अश्रू गळू लागले. 
 
राजेंनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि त्यांना आठवले "राजे आपण सुखरूप विशाल गडावर जावा आणि 5 तोफ्याची गर्जना द्यावी.जो पर्यंत हे कान 5  तोफ्याची सलामी ऐकत नाही तो पर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे आपला देह ठेवणार नाही. राजेंच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. 
 
तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवताच त्यांना आठवले "राजे आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचं. जगून वाचून आलो तर राजे लेकराचे लगीन करीन नाही तर माय-बाप समजून आपणच लगीन लावून द्या" राजे ढसढसा रडू लागले. 
 
आलेल्या साढेचार हजार राजांना काही कळेनासे झाले. आज तर आनंदाचा दिवस आहे, अनाथ झालेला हिंदूंना बाप भेटणार, शिवाजी राजा होणार आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू...? त्याच क्षणी तिथे उभे असलेल्या वडिलधाऱ्या व्यक्तींना राजेंनी हाक दिली. त्यांनी जवळ येऊन राजेंना विचारले राजे आजतर आनंदाचा दिवस आहे आणि आपण रडत आहात. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे आज मला हे सिंहासन मिळत आहे तेच बघण्यासाठी राहिले नाही. कुठल्या तोंडाने मी या सिंहासनावर बसू. हे सिंहासन मला टोचेल. या सिंहासनावर मला बसवले जाणार नाही. यातून उतराई होण्यासाठी काही मार्ग सुचवा. गेलेल्यांचे पाईक म्हणून आज आपण माझ्याकडून काही मागून घ्या.
 
ते मदारी काका म्हणून होते. ते म्हणे- "राजे जे गेले त्यांनी काही मागितले नाही तर मी काय मागावे ? " राजे म्हणाले काका आपण काहीही मागावे म्हणजे माझी उतराई होईल. यावर काका म्हणाले ठीक आहे राजे आपण एवढे म्हणत आहेत तर माझी एक इच्छा आहे, या सुवर्ण बत्तीस मणक्याचे रत्नजडित सिंहासनाची चादर बदलण्याचे कार्य या गरिबाला द्यावे या परी माझी काही मागणी नाही. यावर राजेंनी त्यांना ते कार्य सोपविण्याची हमी देऊन सिंहासन आरूढ झाले आणि पुढील कार्य पार पाडले आणि त्यांनी सत्ता सांभाळली. सगळ्यांनी शिवाजींचा जयघोष केला- 
 
प्रौढप्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस 
सिंहासनाधीश्वर,
गो ब्राह्मण प्रतिपालक 
भोसले कुलदीपक,
हिन्दवी साम्राज्य संस्थापक 
मुघल जन संघारक 
श्रीमान योगी,
योगिराज 
बुद्धिवंत,
कीर्तिवंत 
कुलवंत,
नीतिवंत 
धनवंत,
सामर्थ्यवंत,
धर्मधुरंधर,
श्रीमंत श्रीमंत श्रीमंत 
महाराजाधिराज 
छत्रपती शिवाजी महाराजांची जय
जय भवानी .. जय शिवाजी.... 
हर हर महादेव

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती