सचिन वाझे प्रकरण : मुंबई क्राईम ब्रांचमध्ये तब्बल 'एवढ्या' अधिकाऱ्यांच्या बदल्या

बुधवार, 24 मार्च 2021 (18:03 IST)
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्राचमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे बदल करण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बीबीसीशी बोलताना क्राइम ब्रांचमधील काही अधिकाऱ्यांची बदली केल्याची माहिती दिली आहे.
क्राइम ब्रांचमध्ये गेल्याकाही वर्षांपासून असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्राइम ब्रांचच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
मुकेश अंबानी प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिसांवर प्रशचिन्ह उपस्थित झालं होतं. सचिन वाझे यांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटमधील API रियाझुद्दीन काझी यांची देखील बदली करण्यात आली आहे.
वाझे यांच्या अटकेनंतर NIA ने API रियाझुद्दीन काझी यांची चौकशी केली होती.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर सर्वप्रथम पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली होती. राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तात्काळ उचलबांगडी केली. त्यानंतर पोलीस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.
 
'हिरेन यांच्या हत्येसाठी निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर'
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) नुकतीच पत्रकार परिषद घेतली.
मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेंनी पॅरोलवर बाहेर असलेल्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे.
मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे प्रमुख संशयित आरोपी आहेत. महाराष्ट्र ATS ने ही माहिती दिलीये.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी वाझे सद्या NIA च्या कोठडीत आहेत. 25 मार्चला NIA ची कोठडी संपणार आहे.
"मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंच्या चौकशीसाठी ATS ने NIA कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती," महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिली.
हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबई ATS ने निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरला अटक केलीये. कोर्टाने दोन्ही आरोपींना 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह म्हणाले, "विनायक शिंदे यांनी मनसुख हिरेनला फोन करून बोलावलं होतं. त्याने हिरेनचा खून केला. याचे पुरावे मिळाले आहेत."
ATS अधिकारी माहिती देतात, मनसुख हिरेनच्या हत्येवेळी शिंदे रेतीबंदर परिसरात उपस्थित होते.
विनायक शिंदेला 2007 मध्ये लखन भय्या फेक एन्काउंटर प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. कोरोना काळात शिंदे पॅरोलवर बाहेर होता. एटीएसचे अधिकारी सांगतात, शिंदे पेरोलवर बाहेर आल्यापासून वाझे यांच्यासाठी काम करत होता.
ATS ने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला हत्येच्या ठिकाणी नेऊन हत्या कशी केली याचं रिक्रिएशन करून घेतलंय. एटीएसने तपासात अनेक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत.
"आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहेत," अशी माहिती ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिलीये.
ATS अधिकारी सांगतात, नरेश गोरने 14 सामकार्ड गुजरातहून आणले होते. यापैकी 5 सामकार्ड विनायक शिंदे यांना देण्यात आले होते.
 
फोन टॅप प्रकरण
"विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 24 किंवा 25 ऑगस्ट 2020 ला राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना माहिती दिली. महासंचालकांनी गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पोस्टिंग आणि बदल्यांमध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गैरवर्तनाची माहिती दिली. टेलिफोन इंटरसेप्शनच्या बेसवर ही माहिती मिळाली होती," असा दावा परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही फोन महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर विभागातले अधिकारी करत होते का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या माहितीच्या आधारे सरकारवर टीका केली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. तर सत्ताधारी आघाडीने या आरोपांचं खंडन करत म्हटलं की रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत आणि फोन टॅपिंगचं कृत्य बेकायदेशीर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती