मुंबई साकीनाका बलात्कार : CCTV च्या आधारे आरोपीला अटक - पोलीस आयुक्त

शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (15:31 IST)
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. आज (11 सप्टेंबर) दुपारी हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
 
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले, "सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीला पकडण्यात आलंय. आरोपीचं नाव मोहन चौहान असून, तो उत्तर प्रदेशचा राहणारा आहे."
 
आरोपी मोहन चौहानला अटक केली असून, 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेतलीय, असंही नगराळे यांनी सांगितलं.
 
तसंच, या प्रकरणात एकच आरोपी आहे, ज्याला अटक करण्यात आलीय. पीडित महिला बेशुद्ध होती, त्यामुळे जबाब नोंदवला आला नाही, अशी माहितीही हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
मुंबईतील साकीनाका याठिकाणी खैरानी रोड परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर पीडित महिला शुक्रवारी रात्री (9 सप्टेंबर) साकीनाकाच्या खैरानी रोड भागात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं.
 
या बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
 
साकीनाका बलात्कार प्रकरण हे मानवतेला काळिमा फासणारं आहे, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करून तात्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी केली.
साकीनाका बलात्कार प्रकरण काय आहे?
मुंबईतील साकीनाका याठिकाणी खैरानी रोड परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहिती आज तकने दिलेल्या वृत्तात नमूद केली आहे.
 
सदर पीडित महिला शुक्रवारी रात्री (9 सप्टेंबर) साकीनाकाच्या खैरानी रोड भागात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं.
 
पीडित महिलेची परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
 
या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले.
 
दरम्यान, याप्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
 
पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला वेग देऊन तातडीने एका संशयिताला अटक केली. पण या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे.
महिला आयोगानं घेतली दखल
राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण होणं आणि त्यांचं संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं महिला आयोगानं म्हटलं आहे.
 
माध्यमांमधील वृत्ताचा उल्लेख करत महिला आयोगानं या प्रकरणी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 376, 307 आणि 325 या कलमान्वये आरोपींवर कारवाई करता येणं शक्य असल्याचं महिला आयोगाच्या वतीनं निदर्शनास आणून देण्यात आलं आहे. त्यानुसार या प्रकरणात योग्यप्रकारे गुन्हा दाखल होणं गरजेचं असल्याचं महिला आयोगानं म्हटलं आहे.
 
पीडितेला एवढ्या निर्घृण अत्याचाराचा सामना करावा लागला. हे अत्याचार पाहता या प्रकरणाचं गांभीर्य समोर येतं असं महिला आयोगानं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती