एकाही मनसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर देशात तांडव होईल : मनसे

शनिवार, 16 एप्रिल 2022 (07:40 IST)
मशिदींच्या भोंग्यांवरुन आता मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि मनसेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्हाला छेडले तर आम्ही सोडणार नाही. तसेच जर मशिद आणि भोंग्यांना हात लावला तर सर्वात पुढे पीएफआय असेल अशी धमकीच पीएफआयने मनसेला दिली होती. यावर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकाही मनसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर देशात तांडव होईल असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात तणाव आणि त्रास नको म्हणून शांत भूमिका घेतली आहे. यामुळे याचा अर्थ असा नाही की कोणीही आम्हाला धमकी देईल असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
 
मनसे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी पीएफआयच्या धमकीनंतर एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आंदोलकांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिलय हे स्पष्ट आहे. भोंग्यांविरोधात कारवाई झाली नाही तर हनुमान चालीसा लावण्यात येणार आहे. आम्हालासुद्धा महाराष्ट्रात तणावात्मक परिस्थिती नको आहे. याचा अर्थ असा कोणीही आम्हाला धमक्या देईल असा होत नाही असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
 
तसेच मुंब्रातील पीएफआयच्या आंदोलनावरुन संदीप देशपांडे यांनी थेट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याचे गृहमंत्री जो शहाणपणा मनसेला शिकवत आहेत. तो त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि पीएफआयच्या लोकांना शिकवावा अशी माझी त्यांना विनंती असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती