'तांदळा- एक मुखवटा'

PR
मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आहेत. हिंदी चित्रपटांकडून वळत प्रेक्षकही हल्ली मराठी चित्रपटांना आवर्जून हजेरी लावतो आहे. त्यामुळे मराठी कलाकारांचा, निर्माते, दिग्दर्शकांचा उत्साहही वाढला आहे. नवनवीन विषय हाताळण्याचे नवे प्रयोग करण्याचे धाडसही ते करत आहेत. असेच धाडस 'आईशप्पथ' या पहिल्याच चित्रपटाने लक्ष वेधून घेतलेल्या निर्मात्या माधुरी अशिरगडे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या कादंबरीवर आधारीत 'तांदळा' या एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची निर्मिती त्या करत आहे. त्याचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक संजय सूरकर करत आहेत.

हा चित्रपट नेमक काय आहे, यासंदर्भात चित्रपटाच्या निर्मात्या आणि संगीतकार माधुरी अशिरगडे यांना बोलते केले असता त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या.

PR
या चित्रपटाविषयी त्या भरभरून बोलल्या. 'तांदळा' या शब्दाचा अर्थ देवीचा मुखवटा, असे सांगून त्या म्हणाल्या, या कादंबरीवर आतापर्यंत दोनदा चित्रपट करण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, दोन्ही वेळा हा हेतू काही सिद्धीस गेला नाही. सर्वांत प्रथम प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी प्रयत्न केला. हेमंत देवकर यांचीही 'तांदळा'वर चित्रपट काढण्याची इच्छा होती. परंतु, काही कारणांमुळे 'तांदळा'वर चित्रपट होऊ शकला नाही.

PR
ही कथा स्त्रीप्रधान आहे, हे सुरवातीलच स्पष्ट करून माधुरीताई म्हणाल्या, या चित्रपटाची कथा ही कादंबरीतल्या सोनसळे भोवतीच फिरणारी आहे. परंपरागत रुढी आणि परंपरेत गुरफटलेली एक व्यक्तिरेखा म्हणजे सोनसळा. स्त्री असल्याने तिच्यावर बंधनांचे ओझे आहे. वासनेने बरबटलेल्या नजरा तिच्या शरीराला नकोशा वाटतात. त्यांचा दंश तिला सतत वेदना देत असतो. परंतु बालपणापासून तिच्यावरती लादलेल्या देवत्वामुळे आणि संस्कारांच्या मुखवट्याने तिला हे सारे सहन करावेच लागते. भ्रम आणि वास्तवातला हा संघर्ष म्हणजे 'तांदळा'.

PR
मुळात माधुरीताईंनाच हेमंत देवकरांनी या चित्रपटासाठी नायिकेच्या भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु, काही कारणांनी या चित्रपटाचे काम रखडल्यानंतर माधुरीताईंना या चित्रपटाविषयी खूपच आत्मीयता निर्माण झाली. काहीही झाले तरी चित्रपट काढायचाच असे ठरवत त्यांनी काम सुरू केले. आता हा चित्रपट शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या डबिंग सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पश्चिम महाराष्ट्रात झाले आहे. गावची पार्श्वभूमी असल्याने चित्रीकरणादरम्यान वेगळा सेट निर्माण करण्याची फारशी गरज न भासल्याचे त्या म्हणाल्या.

'आई शप्पथ' या माधुरीताईंच्या पहिल्या चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली होती. अतिशय श्रवणीय असलेल्या या गाण्यांत माधुरीताईंचीही बंदीश होती. यावेळी माधुरीताईंनीच संगीतकाराची जबाबदारीही स्वीकारली आहे. या चित्रपटात तीन गाणी आहेत. प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांनी ती लिहीली आहेत.

संजय सूरकर यांच्याशी ताईंचे ट्युनिंग चांगले जमले आहे. म्हणूनच 'तांदळा' त्यांच्याच दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आसावरी जोशी खूप दिवसांनी आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्याशिवाय उपेंद्र लिमये, तुषार दळवी, अनंत जोग, उमेश कामत यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा