लुटणार्‍यांच्या हातात सत्ता देणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल

गुरूवार, 2 ऑक्टोबर 2014 (10:47 IST)
महाराष्ट्राचे लचके तोडणार्‍याकडे महाराष्ट्राची सत्ता देणार का? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या जाहीर सभेत केला. उद्धव ठाकरेंनी भाजपवर रोखठोक टीका केली. केंद्रात सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी शिवसैनिक लागतो, आता राज्यात का चालत नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 
परभणी येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी दोन बालकांना व्यासपीठावर बोलावून आपल्या ई-शिक्षणाच्या प्रकल्पाची माहिती दिली.
 
राज्यात दुष्काळ असताना मोदी सरकारने काश्मिरात दाखवलेली माणुसकी मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठीही दाखवावयास हवी होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर हिंदुत्वाशी असलेले नाते भाजपने तोडले. ही वृत्ती म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो, अशीच आहे. शिवजयंती साजरी करणारे आज छत्रपतींचा आशीर्वाद मागत आहेत. आजही हिंदुत्वाची गरज असून ओवेसीचे विष येथे वळवळणार असेल, तर ती मस्ती शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.

वेबदुनिया वर वाचा