ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर मी फक्त तोंड दाखवण्यासाठी आलो नाही” तर…. , पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

शनिवार, 22 जुलै 2023 (20:56 IST)
At Thakurwadi on Ershalgarh ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून किमान ४० ते ५० घरं मलब्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही घटनास्थळी पाऊस चालू असल्यामुळे एनडीआरएफच्या बचाव पथकांना मदतकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
 
दरम्यान आज शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “बोलण्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत. ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर मी फक्त तोंड दाखवण्यासाठी आलो नाही. तर, भविष्यात तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत.”
 
“आसपासच्या वस्त्या आणि तुमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करू की पुन्हा अशा संकटाशी सामना करण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच वस्त्या दरडग्रस्त कधीही होऊ शकतात. पण, म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही. ही घटना घडण्यापूर्वी येथील पुनर्वसन झालं पाहिजे होते. पण, दुर्दैवाने ही घटना घडली आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
 
“अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तरुण आणि महिलांना नोकरीची व्यवस्था करावी. फक्त घर बांधून पुनर्वसन होणार नाही. यात राजकारण कुठेही आणणार नाही. राजकारणाच्या पलीकडे माणुसकी हा भाग असतो. पुनर्वसन होईपर्यंत ज्या गोष्टींची मदत लागेल, ती करू,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती