कल्याण आणि बदलापूरला पाण्याचा वेढा, वीज पुरवठा बंद

गुरूवार, 22 जुलै 2021 (21:59 IST)
मुंबई आणि उपनगरांनाही पावसाने झोडपून काढलं आहे. यात कल्याण आणि बदलापूर शहराला पाण्याने वेढा घातला आहे. कल्याणमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावरही झाला आहे. निर्माण झालेली पुरजन्य परिस्थिती पाहता महावितरणतर्फे 17 हजार 800 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. 
 
महावितरणच्या कल्याण परिमंडळ 1 अंतर्गत बारावे इथून निघणाऱ्या मुरबाड रोड, शहाड, योगीधाम, घोलप नगर परिसरातील 80 ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत. तर तेजश्री येथून निघणाऱ्या पौर्णिमा फिडरवरील पौर्णिमा सर्कल भागातील 9 ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात आले आहे. मोहने फिडरवरील 20 ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात आल्याचं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे. या सर्व परिसरात साचलेल्या पाण्याची पातळी कमी होईल त्यानुसार या बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती