मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्ष होऊनही पूर्ण का झालेला नाही?- राज ठाकरे

मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (15:49 IST)
राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. यात राज ठाकरेंनी पक्ष संघटनेसोबतच कोकणातील समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्याचं आश्वासन जनतेला दिलं. या दौऱ्याबाबत बोलत असताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख केला. तसंच या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी आज दिली. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
 
"मी नुकताच कोकण दौरा केला. मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिली. त्यानंतर नितीन गडकरींना फोन केला आणि माहिती दिली. जर समृद्धी महामार्गासारखा ७०० किमी लांबीचा महामार्ग इतक्या कमी वेळात होऊ शकतो. मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्ष होऊनही पूर्ण का झालेला नाही? गडकरींनी याबद्दल सविस्तर माहिती मला दिली. दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले वगैरे इतर माहिती दिली. पण जनतेला या सबबी देता येत नाहीत. आता तुम्हीच वैयक्तिकरित्या यात लक्ष घालून काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल ते बघा असं गडकरींना सांगितलं आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती