सप्तशृंगी गडावर बोकड बळीची प्रथा पुन्हा सुरु, उच्च न्यायालयाने दिली परवानगी

गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (21:13 IST)
देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्ध असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडावर बोकड बळीची प्रथा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याच्या मुहूर्तापासून मागील 5 वर्षापासून बंद करण्यात आलेली बोकड बळीची प्रथा पुन्हा पार पाडण्यात येणार आहे. ही प्रथा पुन्हा सुरु व्हावी यासाठी धोडांबे येथील आदिवासी विकास सोसायटीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने आता या प्रथेला पुन्हा परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाने अटी-शर्थीसह ही प्रथा पुन्हा सुरु करण्यात परवानगी दिली आहे.
 
दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी दिला जातो अशी परंपरा आहे. मात्र २०१६ ला मंदिर आवारात बोकड बळी देण्याच्या वेळी बंदुकीच्या छऱ्यांने बारा जण जखमी झाले होते. यानंतर सुरक्षेचे कारणास्तव प्रशासनाकडून मंदिरात बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती. सुरुवातीला भाविकांनी या निर्णयावर मोठा विरोध दर्शवला होता, मात्र नंतर भाविकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करत ही प्रथा पूर्णपणे बंद केली होती.
 
सप्तश्रृंग गडावर वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यात नवरात्रोत्सवात गर्दीची लाटच उसळते. दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी दिला जातो अशी परंपरा आहे. या परंपरेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. त्यामुळे मंदिराच्या परिसरात मोठ्या-प्रमाणावर चेंगरा-चेंगरी होत होती. यादृष्टीने देखील बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती