मात्र, तेव्हा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता : शरद पवार

बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (21:34 IST)
राजकीय गोंधळात महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मौन सोडलं असून निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.
 
“अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता. नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही. निवडणूक आयोगाचा वापर विरोधात केला जात आहे. हा राजकीय पक्षावरचा हल्ला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय कधीच दिला नव्हता. निवडणूक आयोगाचा असा निर्णय पहिल्यांदाच पाहिला.” शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. त्यांच्या निवडणूक चिन्हावरून वाद निर्माण झाला होता. माझीही काँग्रेसविरोधात पक्ष चिन्हावरून लढत सुरू होती. मात्र, तेव्हा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
 
सत्तेचा गैरवापर करून एखाद्या पक्षाला व एखाद्या नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी लोक त्या नेतृत्वा सोबत उभे राहतात. यापूर्वीही काही पक्षांमध्ये फूट पडली. मात्र, रागाची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेण्याचा प्रकार आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय हे महत्त्वाचं आहे’, असे शरद पवार म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती