‘ऊर भरून आला’, जितेंद्र आव्हाडांची मोदींवर उपहासात्मक टीका

मंगळवार, 15 जून 2021 (11:02 IST)
‘इंटरनेट बंदीत जगात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या भारताने काल जी ७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेत “इंटरनेट बंदी विरोधाच्या” ठरावावर स्वाक्षरी केली. ऊर भरून आला!’, अशी उपहासात्मक टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
 
११ ते १३ जून दरम्यान इंग्लंडमध्ये जी-७ राष्ट्राची परिषद झाली. जी-७ देशांत ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान व अमेरिका यांचा समावेश असून भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका हे अतिथी देश आहेत. या परिषदेत काही ठराव मांडण्यात आले होते. त्यापैकी एक म्हणजेच जगातील अनेक देशांमध्ये इंटरनेट बंदी करून मानवाधिकारांची गळचेपी होत असल्याच्या मुद्द्यासंदर्भात ठराव प्रस्तावित करण्यात आला होता.
 
इंटरनेटबंदी विरोधातील या ठरावावर भारतानेही स्वाक्षरी केली. या ठरावावर स्वाक्षरी करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड निशाणा साधला. आव्हाड यांनी एक ट्विट करत सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करत खोचक टोला लगावला. “इंटरनेट बंदीत जगात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या भारताने काल जी ७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेत “इंटरनेट बंदी विरोधाच्या” ठरावावर स्वाक्षरी केली. ऊर भरून आला!,” असं म्हणत आव्हाडांनी सरकारला चिमटा काढला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती