"जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा बाळासाहेबांनी माझा 'लखोबा लोखंडे' असा उल्लेख केला होता. 'तो मी नव्हेच' मधला लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही, तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला", असं छगन भुजबळ म्हणाले. 'एबीपी माझा'शी बोलताना भुजबळांनी यासंदर्भात उल्लेख केला.
दरम्यान, शिवसेना सोडल्याची किंवा बाळासाहेबांना अटक केल्याची खंत वाटते का? असे विचारले असता, "राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत आम्ही श्रीकृष्ण आयोगाची स्थापना करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री होतो. महत्त्वाचे म्हणजे आधीच्या सरकारने सर्व फाईल्स बंद केल्या होत्या.
"मात्र, एकेदिवशी अचानक एक फाईल माझ्या टेबलवर आली. त्यात पोलिसांचे काही अहवाल होते. जर मी त्यावेळी बाळासाहेबांविरोधात गुन्हा नोंदवला नसता, तर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप आमच्यावर झाला असता. बाळासाहेबांना अटक झाली, त्यावेळी त्यांना जेलमध्ये नेऊ नका, असे निर्देश मी पोलीस आयुक्तांना दिले होते," अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
"शिवसेना सोडण्याची काही वेगळी कारणं होती. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मी विधानसभेत आमदार होतो. मंडळ आयोग जाहीर झालाच पाहिजे, अशा घोषणा आम्ही देत होतो. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाची घोषणा केल्यानंतर बाळासाहेबांनी त्याला विरोध केला. जातीनिहाय आरक्षण देऊ नये, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मात्र, मी त्यावेळी भटक्या विमुक्त जातींचा मोर्च्यात सहभागी झालो होतो," असं त्यांनी सांगितलं.