शिंदे सरकारने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती

शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (15:13 IST)
राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या विषयावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशन संपलाय पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितले जात आहे. मात्र, आमचे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे.
 
राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती, सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती, असा टोला गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. शहाजी बापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. तसेच, शिंदे सरकारने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
 
दरम्यान, पक्ष सोडणे गैर नाही, परंतु ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली. त्यासोबत गद्दारी करणं चुकीचा आहे, असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. यावर अजित पवारांना गुलाबराव पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे, आम्ही मूळ शिवसेना आहोत, बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे, आम्ही भाजपमध्ये गेलो का, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यापद्धतीने आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळाले आहे. आम्ही पक्षांतर केलेले नाही, जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती