एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं अचानक घडलं नव्हतं तर...फडणवीसांनी काय सांगितलं?

शनिवार, 23 जुलै 2022 (18:13 IST)
महाराष्ट्रात सत्तेकरता नव्हे, तर जनतेकरता सत्तापरिवर्तन झालं आहे, असं उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
"एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण हे अचानक घडलं नव्हतं. ते आधीच ठरलं होतं. खरी शिवसेना आता आमच्यासोबत आहे," असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
 
पनवेल येथील भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
 
"आपण सरकारच्या बाहेर राहू अशी मी तयारी केली होती. पण ज्येष्ठांनी सांगितल्यानंतर मी लगेच उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मला वाटतं हा माझा सन्मान आहे. त्यांनी मला घरी जायला सांगितलं असतं तरी गेलो असतो. मला माझ्या नेत्यांनी मोठा सन्मान दिला. यामुळे मी माझ्या जीवनात कृतकृत्य झालो," असंही फडणवीस म्हणाले.
 
फडणवीस पुढे म्हणाले, "गेली अडीच वर्षं फक्त सूड उगवण्याचं काम सुरू होतं. अडीच वर्षांत प्रगतीची सर्व कामं थांबली होती. केंद्र सरकारनं कोट्यवधी देऊन महाविकास आघाडी सरकारनं कामं बंद केली. एकीकडे बदला आणि दुसरीकडे भ्रष्टाचार असं राज्यात चालू होतं."
 
लोकांच्या मनातलं सरकार आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात स्थापन झालं आहे, असंही फडणवीस म्हणाले.
 
महाविकास आघाडीतल्या पक्षांची मतं फोडून आपण राज्यसभा, विधानपरिषद जिंकू शकलो. आपली मतं नाही फुटली हे लक्षात घ्यायला हवं, असंही ते म्हणाले.
 
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
 
त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, "असा एक नेता देण्याची गरज होती की ज्याच्यातून योग्य तो मेसेज जाईल. आपण जे काही करतोय त्याच्यामधून स्थिरता येईल.
 
"त्यामुळे अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी, केंद्रीय नेतृत्वानं आणि देवेंद्र फडणवीसांनी निर्णय केला की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. दु:ख झालं आपल्याला. पण ते दु:ख पचवून आपण आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेलो."
 
देवेंद्र फडणवीस हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. मी त्यांना मेसेज करताना मुख्यमंत्री महोदय असं लिहितो, तसंच राज्यात देवेंद्र फडणवीस यांचंच निर्विवाद नेतृत्व आहे असंही ते म्हणाले. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
 
'कार्यकर्त्यांच्या मनातला भावार्थ'
चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ प्रदर्शित केला. चंद्रकांत पाटील यांचं ते मत नाहीये. कार्यकर्त्यांना जो धक्का बसलो त्याचं विश्लेषण करतानाचा तो भावार्थ आहे. तो व्हीडिओ आलाच का हा प्रश्न आहे. तो अंतर्गत प्रश्न आहे. तो अंतर्गत सोडवू, असं आशिष शेलार म्हणाले.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. "तो त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे पणं चंद्रकांत पाटील यांनी डोक्यावर दगड ठेवला काय छातीवर ठेवला काय हां त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे."
 
'आधीच ठरलं होतं'
राज्यात सत्ता स्थापन होताना शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे अगोदर ठरले होते. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना फोन करत होते. त्यावेळी ते फोन करत नव्हते. पण अशी सोईची सरकार जास्त काळ टिकत नसतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपल्यासोबत आहे हीच आता खरी शिवसेना आहे.
 
एकनाथ शिंदे यांना नेतृत्व देण्यापेक्षा भाजप ही सत्तापिपासू नाही हे दाखवणं जास्त महत्वाचे होत. भाजप फक्त सत्तेसाठी सरकार पाडते असं नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती