मुख्यमंत्री बदलले का? शरद पवार सरकारच्या घोषणा कधीपासून करू लागले? - चंद्रकांत पाटील

शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (10:28 IST)
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. शरद पवार कधीपासून सरकारच्या घोषणा करू लागले? मुख्यमंत्री बदलले आहेत का? असे सवाल चंद्रकांत पाटलांनी केले आहेत.
 
ऐन सणासुदीच्या काळात होत असलेल्या या संपामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळं उच्च न्यायालयानंही या संपाची दखल घेत, संप मागं घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नसल्यानं हा विषय अधिक गंभीर बनला आहे.
 
याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यानं हे घडत आहे, असं पवार म्हणाले होते. न्यायालयानंही संप कायदेशीर नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं कोर्टाचा आदर करून विषय संपवण्याचं आवाहन पवारांनी केलं आहे.
 
यावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही. सरकार अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही, मात्र भाजप ताकदीने त्यांच्या मागे असल्याचं पाटील म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती