राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या - नवाब मलिक

गुरूवार, 22 एप्रिल 2021 (10:30 IST)
राज्यात कोरोनाची गंभीर व भयावह परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला दिवसाला २६ नव्हे तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 
 
दरम्यान केंद्रसरकारने नुकताच आपल्या देशातील विविध राज्यांना वाटप केलेला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या डाटा जाहीर केला असून त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. 
 
या डाटामध्ये राज्याला फक्त २६ हजार इंजेक्शन्स देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे संकट अधिकच वाढेल अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. 
 
महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत आम्हाला प्रतिदिन केवळ ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स येत आहेत आणि आता नवीन वाटपानुसार, महाराष्ट्रात दररोज केवळ २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्राप्त होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्रसरकार देत असलेला साठा अपुरा पडून अजून गंभीर समस्या निर्माण होणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. 
 
केंद्रसरकारने राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी सरकारने केली आहे. मात्र केंद्राने जाहीर केलेल्या डाटामध्ये फक्त २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन दिली जाणार आहे. इतकी कमी इंजेक्शन राज्यातील जनतेला पुरणार नाहीत. त्यामुळे केंद्रसरकारच्या या धोरणावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती