सरकारकडून शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण

गुरूवार, 1 जून 2017 (16:57 IST)

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालास हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी आजपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. तर अनेक ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा. राज्य सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देत आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा