पाठीत खंजीर खुपसला तरी आमचे दरवाजे अजूनही खुले : आदित्य ठाकरे

गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (08:10 IST)
एकनाथ शिंदे सरकारमध्ये शिवसेनेच्या निष्ठावंतांना मंत्रिपद डावलण्यात आलं आहे. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला तरी त्यांच्यासाठी आमचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असं आवाहन शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे समर्थक आमदारांना केलं आहे.
 
बुधवारी (17 ऑगस्ट) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या निमित्ताने विधीमंडळाबाहेर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, "जे गद्दार त्यांच्या सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. 2019 मध्ये आम्ही देशाला पर्याय दिला होता. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार बाहेर पडले, त्यांनी एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे."
 
"सगळं काही देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणं ही महाराष्ट्राची, देशाची संस्कृती नाही. हे घाणेरडं राजकारण असून आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिथं जाऊन अडकलो आहोत, नजरकैदेत आहोत, असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी आमचे दरवाजे अजूनही खुले आहेत. ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती