सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या : वडेट्टीवार

मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (16:29 IST)
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणी अशा सर्वच जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक भागात शेती पाण्याखाली गेलीय. तर सोयाबीनसह ऊस पिकांचं भरुन न येणारं नुकसान झालंय. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केलीय. 
 
विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल मी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत देण्यात येते ते नियम जुने आहेत. त्यामुळे त्यात बदल करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचं वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं.
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटी रुपये दिले होते. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील नुकसान पाहता महाराष्ट्राला किमान 7 हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना देखील आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती