अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा : पडळकर

गुरूवार, 2 जून 2022 (15:01 IST)
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अहमदनगरचे नाव बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे. यात  हिंदू राजमाता पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे भारताचं प्रेरणास्थान आहे. हिंदुस्थान मुस्लिम राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात असताना अहिल्यादेवींनी हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, तसेच त्यांचा जीर्णोद्धार केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झालेल्या अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे, अशी अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचं गोपीचंद पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.
 
अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवींच्या भक्तांना चौंडी येथून दर्शनापासून रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिम बहिणीबरोबर आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो, असंही गोपीचंद पडळकरांनी पत्रात नमूद केले आहे.
 
आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटित झालाय हे लक्षात ठेवा, असंही गोपीचंद पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती