भोंगा प्रकरणाच्या समर्थनार्थ भाजपच्या ३३ शाखा वातावरण निर्मिती करत आहेत : दिलीप वळसे पाटील

बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:38 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्या मुद्याला घेऊन पुढे जात आहेत, त्या मुद्याच्या समर्थनार्थ भाजपच्या ३३ शाखा वातावरण निर्मिती करीत आहेत, असे विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. दिलीप वळसे पाटील यांनी संपर्कमंत्री म्हणून मंगळवारी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची रविभवन येथे बैठक घेतली. दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीत नागपूर महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. 
 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भोंगा प्रकरणाकडे लक्ष न देता सरकारचे काम लोकांपर्यंत घेऊन जावे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला बजरंग दल आणि इतर संघटनांचा पाठिंबा आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यावर एका कार्यकर्त्याने त्यांच्यामागे भाजपच्या ३३ शाखा आहेत, असे सांगितले. हाच धागा पकडून वळसे पाटील यांनी देशातील वातावरण बिघडवण्यासाठी भाजप समर्थित ३३ शाखा काम करीत असल्याचे सांगितले.
 
दरम्यान, महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न कोण करीत आहे, याबाबत गृहमंत्री पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र, अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये झालेल्या हिंसक घटनेमागे कोण आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती