वाचा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय

शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (08:37 IST)
राज्य सरकारने गेल्या वर्षीपासून सुरु केलेल्या शिवभोजन थाळीच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिने ही थाळी 5 रुपयांना मिळणार आहे. आधी या थाळीचे दर 10 रुपये आकारण्यात येत होते.
 
महत्वाचे म्हणजे हे नवे दर पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहेत. तसेच मुदत संपलेल्या व कोरोना विषाणू संक्रमणामुळे निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. यासाठी  अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता देण्यात आली.
 
राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबविण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द. नव्याने निविदा मागविण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती