शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसेच विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंनी आज सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. शुक्रवारी अमरावतीचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. त्यांच्या उपोषणातील मागण्यांची सरकारने गंभीरतेने दखल घेतली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय घेतला जाईल असे म्हटले होते. त्यांनतर आज मंत्री उदय सामंत यांनी या बाबतचे लेखी पत्र दिल्यावर बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतलं.
या वेळी फडणवीसांनी बोलताना म्हटले की शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल आणि समितीमध्ये बच्चू कडू देखील असतील. समितीचा निर्णय आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेता येईल असे आश्वासन दिले होते. समिती स्थापन कधी करण्यात येईल हे जाहीर करण्याची मागणी घेत बच्चू कडू हे आपल्या उपोषणावर ठाम होते. त्यांनतर आज उपोषणाच्या सातव्या दिवशी मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. उदय सामंत पत्र घेऊन आले होते.