मुली भाव देत नाहीत म्हणून नाराज तरुणाने थेट आमदारानांच पत्र लिहिलं

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (15:04 IST)
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील तरुणाचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. मुली भाव देत नाहीत म्हणून नाराज तरुणाने थेट आमदारानांच पत्र लिहिलं आहे. 
 
दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, असं थेट आमदारांना पत्रात लिहिल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. तर आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे.
 
तालुक्यात भरभरून मुली आहेत, मात्र एकही मुलगी पटत नसल्याची तरुणाला चिंता आहे. तक्रार करणारा तरुण खेडे गावातून असून राजुरा-गडचांदूर रोज जाणे-येणे करतो, परंतु त्याला एकही मुलगी पटत नाही, असा मजकूर पत्रात आहे. मात्र हा अर्जदार नेमका कोण आहे आणि कुठे राहतो याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे.
 
दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेण्ड असते, हे बघून जीव जळून राख होतो, असे पत्रात म्हटले आहे. पत्राच्या शेवटी अर्जदार भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना विधानसभा क्षेत्रातील मुलींना आपल्याला भाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची नमुनेदार विनंती केली आहे.
 
पत्रात नेमकं काय?
 
प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा
विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत
अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा
 
आपला प्रेमी
भूषण जांबुवंत राठोड

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती