जून महिना कोरडा गेल्यानंतर आज (बुधवार) सकाळपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, रायगडमध्ये पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. तीन तासांत मुंबईत 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या पावसाचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गटारी तुंबल्या आहेत.
गेल्या महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस हा तीन तासात मुंबईत झाला. घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये पावसाचं पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात दैना उडाली आहे. मुंबईतल्या चुनाभट्टी येथे सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. कुर्ला येथे पाणी भरल्याने हार्बरची सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे गाड्या उशीराने धावत आहेत.