मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे, असे सांगतानाच आंबेडकर नसते तर आज मोदी नसते असे भावनिक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वांद्रा-कुर्ला येथील एमएमआरडीएच्या मैदानावर मोदींच्या हस्ते मेट्रो 2 आणि 7 मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र मोदी यांच्या मुंबईतील सर्वच कार्यक्रमांवर मित्रपक्ष शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने भूमीपूजनाच्या निमंत्रणावरून युतीत बेबनाव निर्माण झाला आहे.
जगाला मार्टिन लूथरकिंग माहीत आहेत, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगाला माहीत नाही हे आपलेच दुर्दैव आहे. डॉ. बाबासाहेब अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे आले पण त्यांच्यात कटुता कधीही नव्हती, असे मोदींनी सांगितले.