आमचा किमान एक तरी मंत्री बनवा

गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (11:36 IST)
येत्या ३१ ऑक्टोबरला होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी रिपब्लिकन पार्टीच्या किमान एका तरी व्यक्तीला मंत्री बनवावे, अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केली आहे.
 
रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक बुधवारी एम.आय.जी. क्लबमध्ये झाली. या वेळी आठवले यांनी ही मागणी केली. आम्हाला किमान चार मंत्रिपदे देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचप्रमाणे तीन ते चार महामंडळांचे अध्यक्षपद देण्यात येणार होते. या आश्‍वासनांची पूर्तता झाली पाहिजे. महादेव जानकर तसेच राजू शेट्टी यांच्या पक्षाचा प्रभाव पश्‍चिम महाराष्ट्रापुरता आहे. आपल्या पक्षाचा प्रभाव संपूर्ण राज्यभर आहे. येत्या वर्षभरात नवी मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आहेत. दोन वर्षांनंतर मुंबई व ठाणे महापालिकेच्या निवडणुका आहेत. आम्हाला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यास या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. रामदास आठवले, अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, गौतम सोनवणे, राजाभाऊ सरवदे आदींसह जवळ जवळ ४00 पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा