सावित्री नदीवरील पूल कोसळला, वाहून गेली 2 एसटी बस, 8-10 वाहने

बुधवार, 3 ऑगस्ट 2016 (10:09 IST)
महाड- रायगड जिल्ह्यातील महाड टोलनाक्याजवळील राजेवाडी फाट्याजवळचा जुना ब्रिटीशकालीन सावित्री नदीवरचा पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन बसेससह १२ ते १५ वाहने नदीत कोसळल्याची शक्यता व्यक्त होतेय. या अपघातातील मनुष्याहानीबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. घटनास्थळ महाड शहरापासून ५ किमीच्या अंतरावर आहे.
सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल कोसळला असून हा अपघात मध्यरात्री साडे बाराच्या सुमाराला घडल्याचे सांगण्याच येत आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचेही वृत्त आहे.
 
परिसरात किर्र अंधार आणि पावसाची संततधार सुरू असल्याने अद्याप बचाव कार्यही सुरू होऊ शकेलेले नाही. मात्र पुलावरून कोसळलेल्या वाहनांची मोठी संख्या लक्षात घेता बचावकार्यासाठी 'एनडीआरएफ'च्या टीमला पाचारण करण्यात आले असून पहाटे शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, खेडहून महाडकडे रवाना झालेल्या दोन बसेस अद्याप महाडला पोहोचल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुलावरून कोसळलेल्या दोन बसेस याच असाव्यात असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांच्या  नातेवाईकांनी 02141-222118 या क्रमांकावर संपर्क साधावा.

वेबदुनिया वर वाचा