तर पतंजलीवर कारवाई करण्याचा इशारा

शुक्रवार, 3 जुलै 2020 (16:52 IST)
“पतंजलीने बाजारात आणलेल्या ‘कोरोनिल’ नावाच्या औषधाने करोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे करोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल,” असं अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे सांगितल आहे.

“या औषधामुळे करोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध कोरोनिल हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी असून तिचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयानेदेखील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे करोना बरा होत नाही,” असं डॉ. शिंगणे म्हणाले.

“कोरोनिल हे औषधासाठी दिलेले नाव आणि प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनिल चा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती