राहुल गांधींनी ट्विटरच्या बायोमध्ये 'डिसक्वालिफाईड एमपी' अपात्र खासदार लिहिलं

रविवार, 26 मार्च 2023 (12:49 IST)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवरील आपल्या अकाऊंटचा बायो अपडेट करत  'डिसक्वालिफाईड एमपी' (अपात्र खासदार) असं लिहिलंय.

सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आणि नंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आज राहुल यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते देशभर सत्याग्रह करत आहेत. दरम्यान, राहुल गांधींनीही अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. राहुलने त्याच्या ट्विटर अकाऊंटचा बायो अपडेट केला आहे. म्हणजे राहुलने स्वतःहून ट्विटरवर दिलेली माहिती बदलली आहे.

यामध्ये त्यांनी स्वत:ला अपात्र खासदार असे लिहले आहे. हे राहुल गांधींचे अधिकृत खाते आहे. सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.' यानंतर शेवटी त्यांनी 'खासदार अपात्र' असे लिहिले आहे. 
 
काल  राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, तुरुंगात टाका, तरी मी घाबरणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केलं.
 
लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काल (25 मार्च) दिल्लीत पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. परदेशातील भाषणावर भाजपने माफीची मागणी केल्याचा प्रश्न राहुल गांधींना विचारला असता, ते म्हणाले, "माझं नाव सावरकर नाहीय. माझं नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाही."
 
या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोदी-अदानी संबंधांवर भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले, "अदानींच्या शेल कंपनी आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपयांची कुणी गुतंवणूक केली? अदानींचा पैसा नाहीये, तो दुसऱ्या कुणाचा आहे. मग तो कुणाचा आहे?
 
"मी हाच प्रश्न विचारला. संसदेत पुरावे दिले. अदानी आणि मोदींच्या नात्याविषयी मी सविस्तर बोललो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून या दोघांचं नातं आहे. दोघांचं नातं जुनं आहे. माझ्या भाषणाला थांबवण्यात आलं. मी अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहिलं. विमानतळं अदानींनी कायद्याला धाब्यावर बसवून देण्यात आले. मी चिठ्ठी लिहिली. पण काहीच फरक पडला नाही."

लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याच्या घडामोडीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, मला तुरुंगात टाका, पण मी घाबरणार नाही, बोलत राहणार."
माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून मोदींनी मला अपात्र केलं. ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली, असंही राहुल गांधी म्हणाले.
 
मी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानतो, आम्ही सर्व मिळून काम करू. सरकारच्या घाबरलेल्या कारवाईचा फायदा विरोधकांना होईल. एका पत्रकाराने राहुल यांना मानहानीच्या प्रकरणात माफी मागण्याबाबत प्रश्न केला असता राहुल म्हणाले की, माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत. आम्ही सर्व मिळून काम करू. सरकारच्या घाबरलेल्या कारवाईचा फायदा विरोधकांना होईल.राहुल गांधी म्हणाले.

Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती