तसेच ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीच्या यशानंतर पहिल्यांदाच भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल माहिती दिली आणि पंतप्रधानांचे कौतुक केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देण्याचे आणि त्यांचे आश्रयस्थान नष्ट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे, असे भारतीय जनता पक्षाने सोमवारी म्हटले आहे. भाजप नेत्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानने लष्करी कारवाई रोखण्यासाठी करार केला आहे परंतु भविष्यात दहशतवादी हल्ले झाल्यास भारत हा करार मोडेल. असे देखील ते यावेळी म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे आणि आपल्या सशस्त्र दलांच्या अदम्य धाडसामुळे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहे. हे मोदींचे वचन होते." तसेच पात्रा म्हणाले की, ६-७ मे च्या रात्री सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ने आपले १०० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. या कारवाईअंतर्गत भारताने ज्या प्रकारची लष्करी आणि गैर-लष्करी कारवाई केली ती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या युद्धात निर्णायक संदेश मिळाला आहे, असे ते म्हणाले.