महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र, भाजपला सत्ता स्थापनेची कोणतीही घाई नसल्याचे चित्र आहे. भाजपचे निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्रात येणार होते. परंतु त्यांचा दौरा तुर्तास रद्द झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
भाजपचे नवनिर्वाचित आमदार दिवाळीच्या सुटीवर आहे. त्यामुळे मंगळवारी होणारी भाजपच्या विधिमंडळ समितीची बैठक रद्द करण्यात आल्याचे समजते. मात्र, हरियाणात मंगळवारी विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार आहे. येथे मनोहर लाल खट्टर यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहे.
भाजपकडे अपक्ष आणि इतर लहान पक्ष असे एकूण 135 आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांचा प्रस्ताव भाजपने फेटाळल्याचे समजते आहे. मात्र अद्याप याबाबत कहीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यात काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगत अजित पवारांनी आणखी खळबळ उडवून दिली आहे.