कुविख्यात गुंड दाऊद इब्राहीमला लवकरच अटक करून भारतात आणण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यासाठीचा नेमका कालावधी किंवा निर्धारित वेळ काही त्यांनी सांगितली नाही.
दाऊद पाकिस्तानातच दडून बसला असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशनने केला होता. या स्टिंग ऑपरेशनच्या मदतीने भारत सरकारने पाकिस्तानकडे दाऊदला भारताच्या ताब्यात सोपविण्याची मागणी केली आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ‘इसिस’ने एक व्हिडिओ जारी करून भारताला धमकी दिली होती. त्यावर बोलताना राजनाथ यांनी भारताला ‘इसिस’पासून कोणताही धोका नसल्याचे म्हटले. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून देशातील सर्व मुस्लीम देखील ‘इसिस’च्या विरोधात आहेत. भारतातील कोणताही मुस्लीम ‘इसिस’च्या कारवायांचे समर्थन करत नाही. त्यामुळे अशा दहशतवादी संघटनांना देश घाबरू शकत नाही, असेही राजनाथ पुढे म्हणाले.