संसदेत सभागृहाच्या कामकाजात सातत्याने आणि हेतूपुरस्सर अडथळे आणणार्या काँग्रेसच्या २५ सदस्यांच्या निलंबनाची घोषणा लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केल्याने संसदेतील वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे संसदेच्या कामकाजात व्यत्यय आला होता. सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा लिहिलेले फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष महाजन यांनी या पक्षाच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली. या सदस्यांना सभागृहाच्या पाच बैठकींना उपस्थित राहता येणार नाही, असा आदेश महाजन यांनी दिला.