कृष्णेला पूर आला होता. यंदाच्या पावसाळतील हा पहिलाच पूर. पुराचे पाणी पाहण्यासाठी दोन्ही काठांवर गर्दी ओसंडून वाहत होती. त्या गर्दीत पांडुरंगही होता. इतक्यात तेथे असलेला सहदेव ओरडला, ‘अरे पांडुरंग, घोंगडं वाहत चाललं आहे. पाहिलसं का?’ लोभी वृत्तीच पांडुरंगची लालसा चाळवली गेली. त्याने मागचा पुढचा विचार न करता नदीत उडी घेतली. घोंगडेही खूप लांब नव्हते. सात-आठ हात मारून पांडुरंग घोंगडय़ाजवळ गेला. त्याने घोंगडे पकडले. मग मात्र तोच ओरडू लागला, ‘वाचवा! वाचवा!’ तेव्हा काठावर असणारे, त्याला व त्याच्या लोभी वृत्तीला ओळखणारे लोक म्हणाले, ‘अरे, यात ओरडण्यासारखं काय आहे? जर तू ते घोंगडं बाहेर आणू शकत नसशील तर सोडून दे!’ तेव्हा पांडुरंग म्हणाला, ‘अहो, हे घोंगडं नाही, अस्वल आहे. आणि त्यानेच मला पकडलं आहे. कसं सोडू?’